सचित्र मराठी खेळांचे पुस्तक
मे महिन्याची सुटी सुरु झाली की घरातली मुले मोकळी होतात. मग त्यांना कोणत्या कामात अडकवावे असा प्रश्न पडतो. माझ्या लहानपणी आम्ही गल्लीमधली पोरे गल्लीमध्ये वेगवेगळे खेळ खेळायचो. त्यात लिंगोरचा, गोट्या, भोवरा अशा खेळांचा समावेश असायचा. त्यातले बहुतेक सगळे खेळ लो कॉस्ट किंवा शक्यतोवर नो कॉस्ट असायचे. मुली बहुधा काचापाणी, ठिक्कर यासारखे खेळ खेळायच्या. गाण्याच्या, नावांच्या किंवा गावाच्या भेंड्या हा देखील एक असाच वेळ काढू प्रकार होता. ते सारे पोरखेळ या सदरात मोडणारे प्रकार होते. लहानपणाबरोबरच ते संपले. मोठे झाल्यावर त्या खेळांचा कधी कुणी गांभिर्याने विचार केला नाही. आता नातवंडे खेळतात ते खेळ वेगळे. पण परवा एका परिचिताकडे त्याच्या मुलाच्या खेळण्यात (नव्या पद्धतीचा) भोवरा पाहिला. तो काय प्रकार आहे, तो कसा खेळतात हे त्याला मुलाला सांगता येईना. अशा वेळी तो सहज म्हणून गेला की अशा खेळांसाठी एखादी वेबसाईट असायला हवी होती. हे सारे खेळ वाटतात साधे पण खरोखरच ते कसे खेळावेत याची माहिती शास्त्रीय पद्धतीने दिली जाणे गरजेचे आहे. आज ही माहिती मिळण्यासाठी इंटरनेटसारखे साधन उपलब्घ आहे पण शंभर वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी ह्या पोरखेळांकडे कुणी अतीशय गांभिर्याने पाहिले होते आणि त्यावर एक भला मोठा ग्रंथ प्रकाशित केला होता हे आज खरे वाटणार नाही. पण हे घडलेले आहे. बडोदा संस्थानच्या देशी शाळा खात्याने‘ मराठी खेळांचे पुस्तक ’या नावाचा ३८२ पानांचा भलाथोरला ग्रंथच प्रकाशित केलेला आहे. त्यांना कुणी जनता राजा असे संबोधले नाही पण बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे खरोखरच एक जाणते राजे होते. समाजजीवन विविध अंगानी विकसित व्हावे असे वाटणारा आणि त्यासाठी स्वतःची शक्ती अशा कामासाठी जागरुकतेने उभी करणाऱ्या ह्या राजाने हा ग्रंथ १९०५ साली मुद्दाम लिहवून घेतला होता. उत्कृष्ट दर्जाची जाड पुठ्याची बांधणी असणारे हे पुस्तक मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया छापखान्यात छापलेले आहे.याचे प्रत्येक पान आर्टपेपरचे आहे आणि त्याची किंमत होती साडेचार रुपये. त्या काळातली आर्थिक स्थिती लक्षात घ्या. कोणत्याही सरकारी कचेरीतल्या व मध्यम स्थितीत राहणाऱ्या कारकुनाचा महिन्याचा पगार जेमतेम पाचसात रुपयांच्या आतबाहेर होता. अशा वेळी ह्या पुस्तकाची किंमत चक्क साडेचार रुपये होती. म्हणजे कल्पना करा की महिना दहा हजारांचा पगार मिळणाच्या आजच्या माणसाच्या दृष्टीने हे पुस्तक चकक सातआठ हजारांचे होते. म्हणजे एका मुलांच्या पोरखेळावरचे एक पुस्तक तेही सयाजीरावांसारख्या एका प्रगतीशील राजाने मुद्दाम तयार करवून घेतलेले आणि तेही इतक्या महागाचे. ही सगळी गोष्ट आज अजब वाटावी अशीच आहे.पुस्तक सचित्र आहे. त्यातली चित्रे म्हणजे फोटोच्या प्लेटस आहेत. शंभरवर्षांपूर्वी छपाईचे तंत्र फारसे विकसित झालेले नसतांनाही ते अतीशय स्पष्ट आणि सुबक छापले गेलेले आहेत. अर्थात हे यश टाईम्स छापखान्याचे आहे.
पुस्तकाचे सरळसरळ
दोन भाग आहेत. पहिला भाग आहे मुलांच्या खेळाचा. त्यात सुरुवातीला चकणे, भिडू वाटून घेणे, यासारख्या खेळाला
सुरुवात करण्यापूर्वीच्या प्रकारांची माहिती दिली आहे. लहानपणी लपंडावासारखा
कोणत्याही खेळाची सुरुवात ह्या चकण्याने व्हायची आणि त्यात इतरांना हातोहात
बनविण्याची विद्या काहीजणांना अवगत असायची याची आठवण माझ्या पिढीतल्या लोकांना
असेल पण ह्या पुस्तकात चकण्याबद्दल साद्यंत माहिती दिली आहे. नंतर खेळाचे वर्णन
ह्या भागात ८४ खेळ दिलेले आहेत. त्यात विटीदांडू, भोवरा,
पतंग, लंगडी या सारखे आजच्या पिढीला माहिती
असण्याची शक्यता असणारे खेळ जसे आहेत लिंगोरचा, आबाधोबी,
हत्तीसोंड, टिनटिनटिंगो, सातटाळी यासारखे आज अस्तंगत झालेले कितीतरी खेळप्रकार आहेत. आमच्या गल्लीत
मुलामध्ये अतीशय आवडीचा असणारा खेळ म्हणजे गोट्या. त्यावर ह्या पुस्तकात चक्क नऊ
पाने खर्ची घातलेली आहेत. माझ्या लहानपणी गोट्या खेळणे हा काही फारसा प्रतिष्ठेचा
प्रकार मानला जात नसे. हे पुस्तक त्यावेळी हाती पडले असते तर गोट्या खेळण्याला
आक्षेप घेणाऱ्या व त्यावर टीका करणाऱ्यांच्या तोंडावर ते मारता आले असते व त्यांना
निरुत्तर करता आले असते असे आता वाटते आहे. बुद्धीबळ,गंजिफा,
सोंगट्या ह्या खेळांचा समावेश चातुर्यात्मक खेळात करुन
त्यांच्यासाठी लेखकाने एक स्वतंत्र विभाग केलेला आहे. त्या भागात दिलेला मोक्षपट
बघण्यासारखा आहे. आजच्या काळातल्या सापशिडीसारखाच असणारा हा खेळ खेळतांना तत्कालिन
सामाजिक आणि सांस्कृतिक कल्पनांची मांडणी करणारी घरे पटावर तयार केलेली दिसत आहेत.
त्यात शरीरसंस्कार, सदाचार, यज्ञ,
निश्चलतपश्चर्या हा वर चढण्याचा एक मार्ग आहे तो ब्रह्मलोकापर्यंत
जातो तर दुसरा मार्ग सदुपदेश,श्रद्धा, भक्ती,
उपासना, अचलनियम, सच्चिदानंदपदापर्यंत
नेतो. ह्या खेळाची माहिती देतांना लेखक मुद्दाम माहिती देतो आहे की ‘हा खेळ ज्ञानदेवाने उपन्न केला म्हणून ह्यास ज्ञानदेवाचा मोक्षपट असे
म्हणतात. ज्ञानमार्ग करुन देणारे हे एक साधन आहे. पुण्यवानांची व पापी लोकांची
मरणानंतर कोणती गति होते व सच्चिदानंद-अविनाश-पद कसे प्राप्त होते ह्याचे हे
द्योतक आहे .’ यातल्या शिड्या जशा ब्रम्हलोक, वैकुंठ आणि सच्चिदानंदपदाकडे नेतात तसे यातले साप कुलक्षय ,भयंकर नरक याकडे नेतात हे बघण्यासारखे आहे. रिकामपणी खेळला जाणारा एखादा
खेळही संस्कारक्षम असू शकतो ही त्याकाळाला साजेशी कल्पना कदाचित आजच्या निरर्थक
किंवा हाणामारीच्या कम्पुटर गेम्सच्या काळात विसंगत पण म्हणूनच वेगळे वाटणारे आहे.
पुस्तकातला दुसरा
भाग मुलींच्या खेळांचा आहे. त्यात ९५ खेळ प्रकार दिलेले आहेत. फुगडी, झिम्मा, कोंबडा, पिंगा,
काचापाणी, सागरगोटे, भोंडला
यासारखे कितीतरी गंमतीशीर प्रकार यात दिलेले आहेत. खेळाबलची माहिती सविस्तर यावी
याचा सर्वतोपरी प्रयत्न लेखकाने केलेला जाणवतो आहे. एका सागरगोट्यांचे चक्क ४५
प्रकार दिले आहेत आणि ४५/४६ पाने त्यावर लिहीलेली आहेत. माझ्या लहानपणी दोन्ही
हाताचे पंजे जमिनीवर ठेऊन दस्ता,पिंजर, खार अशी नावे घेत हाताची बोटे मोजण्याचा खेळ रिकामपणचा बैठा उद्योग म्हणून
विशेषतः लहानमुलांशी खेळला जात असे. हा खेळ ह्या पुस्तकात दिलेला आहे आणि ही सगळी
नावे दिलेली आहेत. खार नंतर आम्ही मुले कबुतर म्हणत असू शंभरवर्षांपूर्वी ह्या
कबुतर ऐवजी समुद्र म्हटले जात असे असे ह्या पुस्तकावरुन दिसते आहे.
एकूण काय, लहान मुलांचे पोरखेळ हा देखील गंभीर लिखाणाचा प्रसंगी संकलन
वा संशोधनाचा विषय ठरु शकतो हे ह्या पुस्तकामुळे लक्षात येते. जवळजवळ एकशेदहा
वर्षांपूर्वीची पिढी असा विचार करत होती आणि त्याविचारातूनच हे पुस्तक तयार
करण्यात आले. बडोदानरेश सयाजीराव गायकवाडांच्याबद्दलच्या अनेक अद्भुत गोष्टी
वाचनात येतात. ते किती प्रागतिक होते, किती शिक्षण व
कलाप्रेमी होते याचे दाखले जुन्या पिढीतली माणसे आत्ताआत्तापर्यंत देत होती. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी सयाजीरावांनीच अर्थसहाय्य
केले होते. आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे जनक व प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक
(ताम्हणे) ऊर्फ माणिकराव यांना बडोदा सरकारने ‘राजरत्न’
व ‘राजप्रिय’ अशा पदव्या
देऊन गौरवलेदेखील व्यायामाशी संबंधित ग्रंथ निर्मिती करवून घेतली होती.
यासगळ्या
माहितीवरुन त्यांची जी प्रतिमा माझ्यासारख्याच्या मनात निर्माण झाली त्या
प्रतिमेला अनुरुप असाच उपक्रम ह्या पुस्तकाने घडवला आहे. विविध खेळप्रकारांची
लोकांना माहिती व्हावी व त्यांचा प्रसार व्हावा यासाठी देशी रमत या नावाने एक
पुस्तक त्यांनी गुजराथी भाषेत तयार करवून घेतले होते. पण मराठी भाषेत असे पुस्तक
बिलकुल नाही हे पाहून निरनिराळ्या प्रांतांमधून खेळांची माहिती मिळवून ती एकत्र
करवून पुस्तक रुपाने छापण्याची इच्छा प्रदर्शित करुन आपल्या संस्थानाच्या शाळा
शिक्षण खात्याला या कामाला लावण्यात श्रीमंत सयाजीमहाराजांचा शिक्षण ह्या विषयाकडे
पाहण्याचा जो दृष्टीकोन दिसून येतो तो आजच्या व्यवस्थेकडे पाहतांना वेगळा आणि
म्हणूनच महत्वाचा ठरतो.
( ग्रंथ सौजन्य : सार्वजनिक वाचनालय , नाशिक
